Contact Banner

राज्यभरात निवडणुकीशी संबंधित १५९ गुन्हे,ईव्हीएम मोडतोड,आचारसंहितेचा भंग

 

159 election-related crimes reported across the state, including EVM tampering and violation of model code of conduct

राज्यभरात निवडणुकीशी संबंधित १५९ गुन्हे,ईव्हीएम मोडतोड,आचारसंहितेचा भंग

    लेवाजगत न्यूज मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निवडणुकीदरम्यान १५९ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात अदखलपात्र गुन्ह्यांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. निवडणुकीशी संबंधित मुंबईत दोन, ठाण्यात चार गुन्हे, नवी मुंबईत तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. परळी येथे ईव्हीएम मशीन मोडतोडीप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ११ जणांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

    निवडणुकीच्या काळात मुंबईत दोन गुन्हे व दोन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला गुन्हा आग्रीपाडा पोलिसांनी दाखल केला होता. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचे बनावट पत्र प्रसारित केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या माजी शाखाप्रमुखाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय मुंबईत मुंबादेवी व मलबार हिल येथील मतदारयादीसह गुजरातमधील दोन व्यक्ती सापडल्या. त्यांच्याविरोधात व्ही. पी. रोड पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.


   आरोपी हरेशभाई गुकिया (५२) व मनसुख ठासीभाई मवानी (५०) हे दोघेही गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असून त्यांच्याकडे मलबार हिल मतदारसंघाची व मुंबादेवी मतदारसंघातील मतदारांची यादी सापडली. दोघेही मुंबईतील मतदारसंघातील नसून विनाकारण मुंबईतील मतदारांची यादी त्यांच्याकडे सापडल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी व्ही.पी. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय निवडणुकीच्या कालावधीत ठाण्यात चार गुन्हे व नऊ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईत तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर नगर, रायगड, चंद्रपूर, पालघर, हिंगोली येथे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

   बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न झाला. तसेच दोन गट एकमेकांसमोर आले. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ११ जणांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी जवळपास ४० जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदान केंद्राची मोडतोड करण्यात आली असून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. तसेच यानुसार चाळीस जणांविरोधात गंभीर आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.