Contact Banner

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, चार भाविकांचा मृत्यू

 

Tirupatī-bālājī-mandirāta-chēṅgarāchēṅgarī-chāra-bhāvikān̄chā-mr̥utyū

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, चार भाविकांचा मृत्यू

वृत्तसंस्था तिरुपती बालाजी-Tirupati stampede तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपती मंदिरात जाऊन बालाजी दर्शन घेतातही. तिरुपतीचं बालाजी मंदिर हे जागृत देवस्थान आहे. पण याच मंदिरात आज अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत उभे आहेत. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं गेलं तेव्हा ही चेंगरा चेंगरी झाली ज्यामध्ये चार भाविकांचा मृत्यू झाला.


मृत चार भाविकांमध्ये एका महिलेचा मृत्यू

चेंगराचेंगरीनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यात चार भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं.


चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले आहेत

चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले, काहीजण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिरुपती देवस्थान समितीने १०, ११ आणि १२ जानेवारी रोजी वैकुंठद्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी १.२० लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता.

   आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी व्यक्त केलं दुःख

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत कार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.


माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी व्यक्त केला शोक

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही सदर घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबाबत माझ्या संवेदना आहेत. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना मी करतो असंही जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं आहे.


     ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते गेट १० जानेवारीला उघडण्यात येणार होते. एक दिवस आधी मंगळवारी तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी वैकुंठ एकादशी आणि वैकुंठ दरवाजे १० ते १९ जानेवारीदरम्यान दर्शनासाठी उघडले जातील, असे सांगितले होते. त्यासाठी टोकन घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते.

     असे मानले जाते की जेव्हा भगवान व्यंकटेश्वर पद्मावतीसोबत लग्नाची योजना आखत होते तेव्हा त्यांनी संपत्तीचा देव कुबेर यांच्याकडून कर्ज घेतले होते. देवाचे अजूनही ते कर्ज आहे आणि भक्त त्याला त्यावरील व्याज भरण्यास मदत करण्यासाठी देणगी देतात. तिरुमला मंदिराला दरवर्षी सुमारे एक टन सोने दान म्हणून मिळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.