डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत सात दिवसीय ‘श्रमसंस्कार’ शिबिराची उत्साहात सांगता
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत
सात दिवसीय ‘श्रमसंस्कार’ शिबिराची उत्साहात सांगता
लेवाजगत न्यूज | आमोदे (ता. यावल)-
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) पथकाच्या वतीने आमोदे येथे आयोजित करण्यात आलेले सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले.
शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात योगासन, प्राणायाम व ध्यानधारणा, तसेच राष्ट्रीय सेवा योजना गीत, विद्यापीठ गीत आणि राष्ट्रगीताच्या पठणाने करण्यात येत होती. दररोज सकाळी प्रभातफेरी काढून ‘पाण्याचे पुनर्भरण – जीवनाचे संवर्धन’, ‘स्वच्छ सृष्टी’ व ‘सिग्नल पाळा – जीवन वाचवा’ असे जनजागृतीपर संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.
सात दिवसांच्या या शिबिरात विविध तज्ज्ञांनी कृषी व सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रा. करण बनसोडे यांनी सेंद्रिय खत उत्पादनावर, प्रा. एन. बी. सदार यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे व तोटे, प्रा. एस. एन. पाटील यांनी पीक विमा विषयावर, तर जैविक घटकांवर प्रा. सायली विधाते यांनी माहिती दिली. डॉ. मोनिका भावसार यांनी शाश्वत शेती व मातीतील सेंद्रीय कर्ब यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्रीती दातीर यांनी महिला सक्षमीकरण व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर व्याख्यान देत एसडब्ल्यूओटी तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. सी. तायडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशनचे प्रशासकीय अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. तायडे यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे दूत बनून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे असे आवाहन केले. यावेळी प्रा. बी. एम. गोणशेतवाड यांनी ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर. डी. चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रीती दातीर तसेच उद्यानविद्या तंत्रज्ञ प्रा. करण बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या सांगतेप्रसंगी डॉ. प्रीती दातीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत