जासई तलावात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू; उरण तालुक्यात हळहळ
जासई तलावात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू;उरण तालुक्यात हळहळ
उरण : सुनिल ठाकूर -
उरण तालुक्यातील जासई गावात रविवारी (दि. ६ जून) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन अल्पवयीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. खेळता-खेळता तलावाच्या खोल पाण्यात गेल्याने हा दुर्दैवी प्रकार घडल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जासई गावातील मोठ्या तलावाजवळ राहणाऱ्या रेहानाखातून समजानअली (वय ८ वर्षे), रवीना परवीन समजानअली (वय ७ वर्षे) आणि शेजारी राहणारी सौम्या कन्हैया कुमार (वय १२ वर्षे) या तिघी मुली रविवारी सकाळी साडेचारच्या सुमारास तलाव परिसरात खेळण्यासाठी गेल्या होत्या. खेळत असताना त्या तलावाच्या खोल पाण्यात गेल्या आणि बुडाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मुलींना पाण्याबाहेर काढून तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिघींनाही मृत घोषित केले. या घटनेची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण माहिती तपासातून समोर येणार आहे.
एकाच कुटुंबातील दोन बहिणींसह शेजारील मुलीचा मृत्यू झाल्याने जासई गावावर शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करत मृत मुलींना श्रद्धांजली अर्पण केली. या दुर्दैवी घटनेमुळे तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांच्या परिसरात बालकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत