Contact Banner

आता पुन्हा कधीच उठू शकणार नाही...' शिवसेना गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंवर बरसली कंगना रणौत

 

आता पुन्हा कधीच उठू शकणार नाही...' शिवसेना गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंवर बरसली कंगना रणौत

लेवाजगत न्युज: शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह एकना शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर सोशल मीडियाही दोन गटांमध्ये दुभागले गेले. काहींनी शिंदेंना तर काहींनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली. सिनेविश्वातील कलाकारही या राजकीय घटनेबाबत मत मांडत आहेत. असे असताना अभिनेत्री कंगना रणौत या विषयावर भाष्य करणार नाही, असे होऊच शकत नाही. अभिनेत्रीने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे पण सडकून टीका केली.

अभिनेत्रीने ट्विटरवर परतल्यानंतर विविध विषयांवर ट्वीट केले आहे. यावेळी तिने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तिने या ट्वीटमध्ये त्यांचे नाव घेतलेले नाही, पण अभिनेत्रीचा रोख ठाकरेंकडेच आहे हे स्पष्ट जाणवते. मुंबईतील तिच्या घरावर झालेल्या कारवाईबाबत तिने या ट्वीटमध्ये लिहिले आहे. स्त्रीचा अपमान केल्याने अशी परिस्थिती आली, असे अभिनेत्रीने लिहिले आहे.


नेमके काय म्हणाली कंगना?

कंगनाने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'दुष्कर्म केल्यानंतर देवतांचे राजे इंद्रदेखील स्वर्गातून खाली पडतात, मग तो तर फक्त नेता आहे. जेव्हा त्याने अन्यायाने माझे घर तोडले, मी तेव्हाच समजले होते की हाही लवकरच पडणार आहे. चांगले काम करुन देवता पुन्हा वर जाऊ शकतात, पण स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच वर उठू शकत नाहीत, आता तो परत कधीच या उठू शकणार नाही'.

अभिनेत्रीने २०२१ मध्ये एक ट्वीट केलेल होते की, 'साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करणाऱ्याचा विनाश निश्चित आहे'. तिचे हेच ट्वीट एका ट्विटर युजरने रीट्वीट करत लिहिले की, 'तिने आधीच अंदाज बांधला होता, म्हणूनच ती क्वीन आहे'. कंगनाने याच ट्वीटवर कमेंट करत वरील लेटेस्ट ट्वीट केले होते. दरम्यान यानंतर तिच्या कमेंट बॉक्समध्ये दोन्ही गटांमधील युजर्सच्या कमेंट पाहायला मिळाल्या. काहींनी कंगनावर कडाडून टीका केली, तर काहींनी तिला पाठिंबा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.