रामदास कदमांचे बंधू पण ठाकरे गटाचे समर्थक, ईडीने अटक केलेले सदानंद कदम कोण आहेत?
रामदास कदमांचे बंधू पण ठाकरे गटाचे समर्थक, ईडीने अटक केलेले सदानंद कदम कोण आहेत?
वृत्तसंस्था मुंबई-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नेते अनिल परब यांचे निटकवर्तीय सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी (१० मार्च) अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सदानंद कदम यांच्या अटकेनंतर ठाकरे गटाने शिवसेना (शिंदे गट) तसेच भाजपावर टीका केली आहे. सूडभावनेतून ही कारवाई केली जात आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
उद्योगवाढीसाठी रामदास कदम यांच्याकडून मदत
सदानंद कदम हे ठाकरे गटाचे समर्थक आहेत. ते अनिल परब यांचे निकटवर्तीय असून शिंदे गटातील रामदास कदम यांचे बंधू आहेत. रामदास कदम आणि सदानंद कदम या दोन भावांमध्ये मागील काही वर्षांपासून मतभेद आहेत, असे म्हटले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास कदम जेव्हा १९९८-२००४ या काळात पहिल्यांदा मंत्री झाले, तेव्हा त्यांनी सदानंद यांना त्यांच्या उद्योगवाढीसाठी मदत केली. याच काळात सदानंद कदम आणि अनिल पबर यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण होऊ लागले. त्यानंतर सदानंद कदम आणि रामदास कदम यांच्यात मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली.
संजय कदम यांच्या पक्षप्रवेशासाठी सदानंद कदम यांचा पुढाकार
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर रामदास कदम शिंदे गटात सामील झाले. तर सदानंद कदम ठाकरे गटाचे समर्थक आहेत. उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या खेड या मतदारसंघाला भेट देत येथे जाहीर सभा घेतली. यावेळी सदानंद कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांचे स्वागत केले. या सभेत माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. रामदास कदम यांचा सामना करण्यासाठी ठाकरे गटाने ही खेळी केल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे सदानंद कदम यांच्याच पुढाकारामुळे संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला, असे म्हटले जात आहे. या सभेच्या पाच दिवसांनी सदानंद कदम यांना ईडीने अटक केली.
उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी झाली म्हणूनच अटकेची कारवाई
सदानंद कदम यांच्या अटकेनंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. “सदानंद कदम हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांनी खेडमधील सभेचे आयोजन केले होते. ही सभा यशस्वी ठरली. याच कारणामुळे सदानंद कदम यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली,” असा आरोप ठाकरे गाटतील नेते संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी सदानंद कदम यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. सदानंद कदम यांच्या अटकेचा आणि आमच्या पारिवारिक मतभेदांचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले आहेत. “सदानंद कदम यांच्या अटकेचा आमच्या परिवाराशी काहीही संबंध नाही. त्यांनी काही बेकायदेशीर कृत्य केले असेल तसेच काही कागदपत्रे लवलेली असतील, तर ते त्यांनी मान्य करावे. आरोप मान्य करून त्यांनी हा विषय संपवावा,” असे योगेश कदम म्हणाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत