RBI Withdrawn 2000 Rs : आरबीआयचा मोठा निर्णय; २ हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या, ‘या’ तारखेपर्यंत नोटा बदलून घेता येणार
RBI Withdrawn 2000 Rs : आरबीआयचा मोठा निर्णय; २ हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या, ‘या’ तारखेपर्यंत नोटा बदलून घेता येणार
वृत्तसंस्था मुंबई-Rs 2000 Notes Withdrawn from Circulation : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी मोठा निर्णय घेत २ हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. २० हजार रुपये म्हणजेच एका वेळी १० नोटा जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी २ हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केलाय. परंतु २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने “इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे कारण देत २ हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलाय.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० च्या नोटा वितरणातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. त्या आपल्याला दिलेल्या मुदतीपर्यंत जमा करता येणार आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाईसुद्धा बंद केली होती.
२०१८-१९ ला छपाई थांबवली
दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २४ (१) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे २ हजारांच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या. ५०० ची नोट बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश काहीसा फोल ठरला. त्यामुळे २०१८-१९ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
२००० ची नोट काळा पैशाला प्रोत्साहन देत होती
२०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी भ्रष्टाचाऱ्यांनी घरामध्ये दडवलेला किमान ३-४ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर येईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा होती. या संपूर्ण व्यवहारात केवळ १.३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला होता. पण आता नोटाबंदीनंतर जारी केलेल्या नव्या ५०० आणि २००० च्या नोटांमध्ये ९.२१ लाख कोटी रुपये गायब झाले आहेत. खरं तर भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) च्या २०१६-१७ ते २०२१-२२ वार्षिक अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. RBI ने २०१६ पासून ५०० आणि २००० च्या एकूण ६,८४९ कोटी चलनी नोटा छापल्या आहेत. त्यापैकी १,६८० कोटींहून अधिक चलनी नोटा बाजारातून गायब आहेत. या गहाळ नोटांची किंमत ९.२१ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. कायद्यानुसार, ज्या रकमेवर कर भरला गेला नाही, तो काळा पैसा समजला जातो. या ९.२१ लाख कोटी रुपयांमध्ये लोकांच्या घरात जमा झालेल्या बचतीचाही समावेश असू शकतो. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर हे मान्य केले आहे की, चलनातून गहाळ झालेला पैसा अधिकृतपणे काळा पैसा मानला जात नाही, परंतु या रकमेतील मोठा हिस्सा हा काळा पैसा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत