Contact Banner

Pune News: साखरपुडा झाला, पण लग्नापूर्वीच काळाची झडप; पुण्यातून फिरायला निघाल्यानंतर नेमकं काय घडलं?

 

Pune News: साखरपुडा झाला, पण लग्नापूर्वीच काळाची झडप; पुण्यातून फिरायला निघाल्यानंतर नेमकं काय घडलं?

लेवाजगत न्युज पुणे:- निरा देवघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कार पडून दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता आहे. मृतांमध्ये तरुणीचा समावेश आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता वारवंड गावाच्या हद्दीत घडली. अक्षय रमेश धाडे (वय २७, रा. अॅक्वामिस्ट सोसायटी, शिंदे वस्ती, रावेत) आणि हर्षप्रीत हरप्रीतसिंग बांबा (वय ३०, रा. पाषाण. मूळ रा. जबलपूर मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. स्वप्नील परशुराम शिंदे (वय २७, रा. तुकाईनगर, हडपसर) बेपत्ता आहे; तर संकेत वीरेश जोशी (वय २८, रा. पाषाण. मूळ रा. वापी, गुजरात) असे अपघातातून वाचलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संकेतने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघे मित्र असून, वेगवेगळ्या ठिकाणी कामास आहेत. शनिवार- रविवारी ते पर्यटनाला, ट्रेकिंगला जात. हे चौघे शनिवारी पहाटे साडेपाच वाजता महाडला जाण्यासाठी पुण्यातून कारमधून निघाले. सकाळी साडेसातनंतर ते भोरमधून महाडच्या दिशेने निघाले. अक्षय गाडी चालवत होता. शेजारी हर्षप्रीत बसली होती. मागील सीटवर स्वप्नील व संकेत बसला होता. वारवंड गावाच्या हद्दीत आल्यावर अंदाज चुकल्याने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला दरीत घसरून पलट्या खाऊन ५० मीटर खोल धरणाच्या बॅकवाटरमध्ये गेली. गाडी पलटी होत असताना संकेत दरवाजा उघडून बाहेर पडला. त्याच्या डोक्यास किरकोळ जखमा झाल्या आहेत.

घटनेचे वृत्त कळताच पोलिस उपअधीक्षक रेखा वाणी, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत जाधव, बळीराम सागळे, हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगड घटनास्थळी पोहोचले. भोईराज मंडळ व सह्याद्री बचाव पथकाने शोधकार्य सुरू केल्यावर हर्षप्रीत आणि अक्षयचा मृतदेह हाती लागला.

विवाहापूर्वीच काळाची झडप

अक्षय व हर्षप्रीतचा साखरपुडा झाला होता. विवाहापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. अक्षयला समाजकार्याची आवड होती. वाडी-वस्तीवररील मुलांना मदत करण्यासाठी तो पुढे असायचा. येत्या १५ ऑगस्ट रोजी पुण्याजवळच्या वस्तीवर गरजूंना देण्यासाठी अक्षयने धान्याचे किट घरी आणून ठेवल्याचे सांगताना त्याच्या वडिलांना अश्रू आवरत नव्हते.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणे व रायगड प्रशासनाने वरंधा घाट सर्व वाहनांसाठी बंद केला आहे. वाघजाई मंदिराजवळ महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याने मातीचे ढीग व बॅरिकेड्स लावून रस्ता प्रतिबंधित केला आहे; तर भोर हद्दीत निगुडघरजवळ बॅरिकेड्स लावून भोर पोलिसांनी रस्ता रोखला आहे. पोलिसांचा पहारा तेथे लावण्यात आला होता. तरीसुद्धा सर्व जण चारचाकीने पुढे गेल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.