आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेते पदी तर भास्कर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेते पदी निवड
आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेते पदी तर भास्कर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेते पदी निवड
वृत्तसंस्था मुंबई-उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भास्कर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. सुनिल प्रभू यांची एकदा प्रतोदपद नियुक्ती करण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरे विजयी आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत. पक्षफुटीचा धोका लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नवनिर्वाचित आमदारांकडून हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार असून सर्व आमदार या निर्णयाशी बांधील असतील, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले जाणार आहे. यावरून दगाफटका होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंकडून खबरदारी घेतली जात असल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाहिजे तशी कामगिरी करता आली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे २० आमदार विजयी झाले. यामध्ये सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, अजय चौधरी या मुंबईकर आमदारांसह नितीन देशमुख, कैलास पाटील, दिलीप सोपल, भास्कर जाधव हे नऊ आमदार पुन्हा निवडून आले आहेत.
विरोधीपक्ष नेतेपदासाठी हालचाली
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आता विरोधी पक्षनेतेपदासाठी तिन्ही पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या २८८आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी किमान २९ सदस्य पक्षाकडे असावे लागतात. शिवसेना ठाकरे गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे १० आमदार आहेत. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाचे २९ उमेदवार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे मविआ विरोधी पक्षनेतेपदासाठी एकत्रित दावा करण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत