Contact Banner

सावद्यात स्मार्ट मीटरप्रकरणी नागरिकांची फसवणूक; भाजप-शिवसेना महायुतीचा ठेकेदारावर कारवाईचा इशारा

 

Sāvadyāta-smārṭa-mīṭaraprakaraṇī- nāgarikān̄cī-phasavaṇūka;- bhājapa-śivasēnā-mahāyutīcā- ṭhēkēdārāvara-kāravā'īcā-iśārā



सावद्यात स्मार्ट मीटरप्रकरणी नागरिकांची फसवणूक; भाजप-शिवसेना महायुतीचा ठेकेदारावर कारवाईचा इशारा


सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – सावदा शहरात महावितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता व चालू मीटर दोषयुक्त असल्याचे खोटे कारण सांगून नागरिकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असून, त्यानंतर ग्राहकांचे वीज बिल सामान्यपेक्षा कैक पटींनी जास्त येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.


या मोहिमेमुळे नागरिकांवर आर्थिक बोजा वाढत असून, ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांकडून खोट्या कायदेशीर धमक्या देत अनेकांकडून हजारो रुपये उकळल्याचे प्रकार उघड झाले आहेत. विशेष म्हणजे, नागरी परिसरात ठेकेदाराच्या माणसांना नागरिकांकडून पैसे घेताना भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले, ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.


नवीन स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या अनियमित वीज बिलामुळे नागरिकांची सरळसरळ फसवणूक होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वीज वापरात कोणताही वाढीव फरक नसतानाही मीटरचे रीडिंग कैक पटींनी जास्त येत असल्याने महावितरण प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.


या पार्श्वभूमीवर आज बुधवार (०६ ऑगस्ट २०२५) रोजी सकाळी ११ वाजता, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, विभागीय कार्यालयात सावदा विभागीय कार्यकर्ता गणेश महाजन यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नागरिकांच्या तक्रारींबाबत तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.


निवेदनातील एकत्रित मागण्या पुढीलप्रमाणे स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवून, यापूर्वी बसवलेले स्मार्ट मीटर व त्याबाबतच्या तक्रारींचे तातडीने निरसन करावे. ज्या ग्राहकांच्या मीटर रीडिंगमध्ये तफावत आहे, ते मीटर त्वरित बदलण्यात यावेत. लाच मागणाऱ्या ठेकेदारांविरोधात चौकशी करून त्यांचे कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे व अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून भविष्यात कोणतेही शासकीय काम देऊ नये.


जर या मागण्या मान्य न झाल्यास भाजप-शिवसेना महायुती व सावदा शहरातील नागरिकांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


या निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, भाजप शहरप्रमुख जे. के. भारंबे,महेश अकोले, माजी नगराध्यक्ष देवयानी बेंडाळे, लीना चौधरी, माजी उपनगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे, युवा सेना शहरप्रमुख मनीष भंगाळे, निलेश खाचणे ,आदींसह शहरातील अनेक नागरिकांनी स्वाक्षरी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.