अतिवृष्टीत उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा, हेक्टरी ५० हजार मदत द्या
अतिवृष्टीत उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा, हेक्टरी ५० हजार मदत द्या
लेवाजगत न्यूज मुंबई –राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची भेट घेऊन परतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत परिस्थितीची माहिती दिली आणि राज्य सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या.
उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या दोन-तीन वर्षांपासून साधारण १४ हजार कोटींची मदत जाहीर झाली, मात्र ती अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही. २०१७ च्या कर्जमाफीची अजूनही प्रतिक्षा आहे. आमच्या काळात आम्ही पंचांग काढून बसलो नाही, संकट आलं की शेतकऱ्यांना मदत केली. आता मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मागणी केली तर सरकार त्यात राजकारण पाहते. हे योग्य नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शेतकऱ्याला “राजकारण करू नका” असे म्हणत त्याच्यामागे पोलिस लावले, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. “ही कुठली लोकशाही? शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा हक्क नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ठाकरेंनी सरकारकडे दोन ठोस मागण्या केल्या –
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी.
- पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत कालबद्ध पद्धतीने द्यावी.
“मी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की, कर्जमुक्ती द्या, हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ जाहीर करून वाटप करा आणि बँकांच्या नोटिसा थांबवा,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत