हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प विलास सायगावकर
हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प विलास सायगावकर
लेवाजगत न्यूज जळगाव - हजारो वर्षांची परंपरा, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक विचार यांचा संगम म्हणजे हिंदू धर्म. या धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि मानवतेचा संदेश.हिंदू धर्माचे स्वरूप अत्यंत व्यापक आणि विशाल आहे. हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून तो जीवन जगण्याची पद्धत आहे असे उदगार विलास सायगांवकर यांनी आज काढले.सकल हिंदू समाज श्रद्धा कॉलनी परिसरातील अनेक उप कॉलनी आणि हाउसिंग सोसायटीच्या वतीने जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात ’विशाल हिंदू मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
पार्वती नगर परिसरातील श्री गणेश मंदिर आवारात, गजानन सोसायटीत आयोजित या मेळाव्यास ह.भ.प. श्री. विलासजी महाराज सायगावकर यांचे आशिर्वचन दिले. त्यांच्यासोबत प्रमुख वक्ते म्हणून श्री. मनोजजी सावंत(जळगाव जिल्हा सहप्रचार प्रमुख, रा. स्व. संघ तथा संचालक, गुरुकृपा क्लासेस शिव कॉलनी) यांचे मार्गदर्शन तर अध्यक्षस्थानी जितेेंद्रजी लाठी, उपाध्यक्ष महेंद्रसिंग पाटील हे होते. कार्यक्रमाची सूरूवात भारत माता प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.ह भ प रामायणाचार्य विलास महाराज सायगावकर यांचे शिक्षण स्वानंद सुख निवासी सदगुरु जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्था आळंदी (देवाची ) २००५ ते २००९ मध्ये झाले असून तेव्हापासून कथा, प्रवचन, कीर्तन या माध्यमातून संत कार्य, देव कार्य,धर्म कार्य समाजसुधारकांचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहे. पुढे बोलतांना त्यांनी या धर्मात विविध विचारधारा, उपासना पद्धती आणि तत्त्वज्ञानाला स्थान आहे. वेद, उपनिषद, पुराणे, भगवद्गीता, रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांनी मानवाला सत्य, धर्म, कर्तव्य आणि आदर्श जीवनाची शिकवण दिली आहे. त्यामुळे हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृतींपैकी एक मानला जातो.हिंदू संस्कार जन्मापासून ते मृत्यूपर्यंत १६ संस्कारांची परंपरा असून या संस्कारांमुळे व्यक्तीमध्ये नैतिकता, कर्तव्यबुद्धी, कुटुंबप्रेम आणि समाजाबद्दलची जबाबदारी निर्माण होते. शेवटी, हिंदू धर्माची महान परंपरा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. संस्कार, संस्कृती आणि धर्माचे तत्व आचरणात आणल्यास समाज अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होईल मनोजजी सावंत यांनी हिंदू धर्माची शिकवण सत्य, प्रेम, आदर या आधारावर टिकून आहे. वसुधैव कुटुंबकम ही भावना हिंदू धर्माने जगाला दिली आहे. म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे, हा विचार हिंदू संस्कृतीची महानता दर्शवतो.परंतु आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनेक हिंदू आपल्या धर्मग्रंथांपासून आणि शास्त्रांपासून दूर जात आहेत. हिंदू धर्माचे शास्त्र केवळ वाचण्यासाठी नसून त्यातील आचार आणि मूल्ये आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने आपल्या संस्कृतीची ओळख करून घेतली पाहिजे आणि त्या मूल्यांचे पालन केले पाहिजे. तसेच संघ शताब्दी निमित्त भारतीयांनी आचरणात पंच परिवर्तन छोट्या छोट्या मात्र देश आणि समाजात अमुलाग्र बदल घडवून आणणार्या आचरणात आणण्याचे आवाहन केले. तर अध्यक्षीय भाषणात जितेंद्र लाठी यांनी अशा संमेलनासाठी निमंत्रण पाठवावे लागते ही शोकांतिका असून हिंदु संघटीत होण्यासाठी मार्मीक कथा सांगून समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले. तर श्रीकांतजी मेंढकी यांनी पोवाडा सादर केला. समारोप पसायदानाने झाला. यावेळी सेल्फी पाँईटची व्यवस्था असल्याने अनेक बांधवांनी सेल्फी काढून घेतला. मेळाव्याचे आयोजन सकल हिंदू समाज, श्रद्धा कॉलनी परिसराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हिंदू समाजात सामाजिक समरसता आणि एकात्मता वाढवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत