Contact Banner

उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी -डॉ.कमलेश तायडे

heatwave-alert-rising-risk-villages-health-precautions-dr-kamlesh-tayade


उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी -डॉ.कमलेश तायडे 

लेवाजगत न्यूज जळगाव : उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका गंभीर स्वरूप धारण करत आहे. काही दिवस सलग तापमान प्रचंड वाढणे, रात्रीही गारवा न मिळणे आणि अंगावर जाळ बसल्यासारखे वाटणे-ही केवळ साधी गरमी नसून उष्णतेची लाट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.गावोगावी वाढता धोका लक्षात घेता आरोग्याची खबरदारी घेण्याचे आवाहन महादेव हॉस्पीटलचे न्युरोलॉजीस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी केले आहे.

 उष्णतेची लाट शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी करते आणि त्यामुळे रक्तदाब बिघडणे, मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळेत उपचार न मिळाल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.उष्णतेच्या परिणामांची सुरुवात काही साध्या लक्षणांनी होते. खूप तहान लागणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, चिडचिड, हात-पायांना गोळे येणे आणि मळमळ ही सुरुवातीची चिन्हे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास हीट एक्सॉश्शन आणि पुढे हीट स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. हीट स्ट्रोकमध्ये रुग्ण गोंधळलेला दिसतो, घाम येणे थांबते, शरीराचे तापमान वाढते आणि बेशुद्ध पडण्याची शक्यता असते.ग्रामीण भागात हा धोका अधिक तीव्र असतो. शेतकाम, बांधकाम, पाण्यासाठीची पायपीट आणि उन्हात प्रवास यामुळे लोक दीर्घकाळ उन्हाच्या संपर्कात राहतात. तसेच अनेक ठिकाणी थंड जागा, पंखा किंवा पुरेसे पाणी उपलब्ध नसते. वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयविकार किंवा किडनीच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण विशेषतः धोक्यात असतात.तज्ज्ञांच्या मते, उष्णतेपासून बचावासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित पाणी पिणे. तहान लागण्याची वाट न पाहता वारंवार पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा ओआरएस घ्यावे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात काम टाळावे आणि शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे. सैल, फिकट रंगाचे कपडे वापरणे, डोक्यावर टोपी किंवा ओढणी ठेवणे आणि अधूनमधून सावलीत विश्रांती घेणे आवश्यक आहे.घरातही उष्णतेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दिवसा खिडक्या आणि पडदे लावून ऊन आत येऊ देऊ नये. लहान मुले आणि वृद्धांना हवेशीर व थंड जागेत ठेवावे. गाडीत किंवा बंद जागेत कोणालाही एकटे सोडू नये.डॉ. तयडे यांनी पुढे सांगितले की, गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब करू नये. रुग्ण गोंधळलेला दिसत असल्यास, उलट्या होत असल्यास, चालता येत नसल्यास किंवा शुद्ध हरपत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. अशा वेळी रुग्णाला थंड जागेत हलवून अंगावर थंड पाणी टाकावे आणि तातडीने रुग्णालयात दाखल करावे.उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी गावपातळीवरही उपाययोजना आवश्यक आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती केंद्रे, ओआरएसचा साठा आणि आशा-आंगणवाडी सेविकांमार्फत नागरिकांची तपासणी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.तसेच, झाडे लावणे हा दीर्घकालीन उपाय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. झाडांमुळे सावली मिळते आणि परिसरातील तापमान कमी होण्यास मदत होते. त्यामुळे गावात आणि शिवारात स्थानिक, जलद वाढणारी झाडे लावण्यावर भर देणे आवश्यक आहे.शेवटी, उष्णतेची लाट ही सहन करण्याची गोष्ट नसून ती ओळखून टाळण्याची आपत्ती आहे. योग्य वेळी खबरदारी घेतल्यास अनेक जीव वाचू शकतात, असे आवाहन डॉ. तयडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.