उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मातीची चोरी, प्रशासनाचे दुर्लक्ष शासनाचे मात्र करोडोचे नुकसान
उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मातीची चोरी, प्रशासनाचे दुर्लक्ष शासनाचे मात्र करोडोचे नुकसान
उरण :सुनिल ठाकूर -महसूल खात्याचे सर्व अधिकारी गाढ झोपेत असतानाच उरण तालुक्यातील चाणजे, चिर्ले,वेश्वी, दिघोडे , विंधने, चिरनेर, कळंबुसरे,मोठी जुई,कोप्रोली,पिरकोण,सारडे,वशेणी,पुनाडे परिसरातून केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी देखील माती उत्खनन करण्याच्या प्रकारांचे पेव फुटले आहे. येथील अनेक ठिकाणी डोंगरांना या कंत्राटदाररुपी घुशी लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या नाका खाली हे भूमाफिया माती उत्खनन करीत आहे, याची सुतराम माहिती देखली या अधिकाऱ्यांना नसल्याने शासनाचे करोडो हुन अधिक नुकसान होत आहे.
जेएनपीए बंदर, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,अटल सेतू या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे २०२१ पासून विकासकांनी, भांडवलदारांनी उरण तालुक्यात विशेष लक्ष केंद्रित केले आहे.उरण तालुक्यात अनेक ठिकाणी सरकारी वनविभाग, गुरचरण, खासगी अशा जमिनीतुन माती माफिया,गाव पुढारी हे बिंधासपणे माती चोरुन विकासकाला विकत आहेत. हे माती माफिया एखाद्या खासगी जागेवर माती काढणीची परवानगी मिळवून हळूहळू बाजूच्या वन जमिनी, सरकारी जमिनी व गुरचरणाच्या जमिनीवरही ताव मारुन माती काढून नेत असतात.त्यामुळे जंगली प्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊन डोंगर बोरके होत आहेत.
एकीकडे माती उत्खननाला बंदी असताना दुसरीकडे मात्र दिवस-रात्र जेसीबी, पोकलेन मशिन चालवला जात आहे. राजरोसपणे डंपरच्या माध्यमातून या मातीची वाहतूक देखील सुरू आहे. मात्र, संबंधित गाव सरपंच व ग्रामसेवक व तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.उरण तालुक्यातील चाणजे, चिर्ले,वेश्वी, दिघोडे , विंधने, चिरनेर, कळंबुसरे,मोठी जुई,कोप्रोली,पिरकोण,सारडे,वशेणी,पुनाडे इत्यादी भागामध्ये मोठय़ा प्रमाणात माती उत्खनन सुरू असल्याने शासनाची अंदाजे ३०० कोटीहून जास्त नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी, आदिवासी नागरिक व्यक्त करत आहे.मात्र तहसीलदारांना या घटनेची माहिती नाही. तरी उरणचे तहसीलदार डॉ उध्दव कदम यांनी घटनास्थळावर पाहणी करत उत्खनन झालेल्या डोंगर भागाचे मोजमाप मोजणी कार्यालयातर्फे केल्यानंतर नेमकी किती माती चोरी झाली आहे व शासनाचे किती नुकसान झालं आहे हे समजू शकेल.मात्र उरण तालुक्यात कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार होत असल्याने न्यायाची अपेक्षा करणार तरी काय असा सवाल सध्या शेतकरी, आदिवासी नागरिक व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत