Contact Banner

वरणगावच्या ‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम ओपीडी पेपरच्या मागील कोऱ्या कागदावर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती

 

varangaon-vasudev-netralaya-unique-initiative-information-on-12-historic-decisions-of-modi-era-printed-on-opd-paper


वरणगावच्या ‘वासुदेव नेत्रालया’चा अनोखा उपक्रम

ओपीडी पेपरच्या मागील कोऱ्या कागदावर ‘मोदी पर्वा’तील १२ ऐतिहासिक निर्णयांची माहिती





वरणगाव (प्रतिनिधी) : वैद्यकीय सेवा देतानाच सामाजिक आणि राष्ट्रीय जनजागृतीची जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडणारे वरणगाव येथील वासुदेव नेत्रालय पुन्हा एकदा आपल्या अभिनव उपक्रमामुळे चर्चेत आले आहे. नेत्रालयाचे संचालक डॉ. नितू पाटील आणि डॉ. सौ. रेणुका पाटील यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या ओपीडी केस पेपरच्या मागील कोऱ्या बाजूचा उपयोग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील १२ वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत ओपीडी पेपरच्या मागील कोऱ्या भागावर मोदी सरकारच्या विविध ऐतिहासिक निर्णयांची माहिती छापण्यात आली आहे. यामुळे कागदाचा अपव्यय टाळण्यास मदत होत असून रुग्णांना उपचारांसोबतच राष्ट्रीय घडामोडींची माहितीही सहज उपलब्ध होत आहे.


नेत्रालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या हाती हा माहितीपर ओपीडी पेपर पोहोचत असल्याने या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. विशेष म्हणजे, हॉस्पिटलमधील अनेक पत्रके व चिठ्ठ्यांच्या मागील बाजू कोऱ्याच राहतात. त्याच कोऱ्या जागेचा विधायक वापर करून समाजप्रबोधनाचे कार्य करण्याचा हा प्रयत्न सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.


या माहितीपत्रकावर पंतप्रधान जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदी, वस्तू व सेवा कर (GST), आयुष्मान भारत योजना, कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर उभारणी, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), डिजिटल इंडिया, उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (PLI) यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी वासुदेव नेत्रालयाच्या टीमचे अभिनंदन केले. समाजप्रबोधनासाठी नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचार आणि जागरूकता निर्माण होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. नितू पाटील यांनी सांगितले की, “रुग्णांची सेवा करत असताना समाजात सकारात्मक संदेश पोहोचविणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करून जनजागृती घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”


या अभिनव कल्पनेचे वरणगाव व परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक भान जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


सामाजिक जनजागृतीचा ‘वासुदेव पॅटर्न’!

वासुदेव नेत्रालयाने सामाजिक जनजागृतीसाठी राबविलेला हा पहिलाच उपक्रम नाही. यापूर्वीही विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देण्याचे काम नेत्रालयाने केले आहे. ‘एकही फूलराणी आता जळणार नाही’, ‘जल प्रतिज्ञा’, ‘अवयवदान – जीवनदान’, ‘विश्वभरातील श्रीराम भक्तांना निवेदन’ यांसारख्या विविध विषयांवर पत्रकांद्वारे जनतेशी थेट संवाद साधण्यात आला होता. समाजहिताचे विषय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याची ही परंपरा वासुदेव नेत्रालयाने सातत्याने जपली असून त्यातूनच ‘वासुदेव पॅटर्न’ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.