मोठा निर्णय - घराबाहेर न पडताच परीक्षा होणार; दोन दिवसात लागणार टाईमटेबल
मोठा निर्णय - घराबाहेर न पडताच परीक्षा होणार; दोन दिवसात लागणार टाईमटेबल
मुंबई, 31 ऑगस्ट : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम परीक्षा घेतल्याखेरीज पदवी देऊ नये, असा निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारला परीक्षेसंदर्भात निर्णय करणं भाग पडलं. आता अंतिम परीक्षेसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. 'विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत न बोलवण्यावर राज्य सरकार ठाम आहे. आज यासंदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिला असून विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचं एकमत झालं आहे', अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षेचा निर्णय घेणारी एक समिती राज्य सरकारने गठित केली होती. या समितीने अहवाल तयार केला आहे. त्यांच्याशी बैठक घेऊन परिक्षा कशी घ्यायची हे ठरवलं जाईल, असं सामंत म्हणाले. 'कुलगुरूंनी आणखी एक दिवस नियोजनासाठी मागितला आहे. त्यामुळे परवा संध्याकाळी ४ वाजता अंतीम निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत', असं ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत