Contact Banner

त्या" पिडीत युवतीचे आ.संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने "मातोश्री" मध्येच झाले "शुभमंगल"

 

"त्या" पिडीत युवतीचे आ.संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने "मातोश्री" मध्येच झाले "शुभमंगल"

बुलडाणा  प्रतिनिधी-13 डिसेंबर -येथून जवळच असलेल्या डोंगरखंडाळा येथील ‘त्या’ पिडीत युवतीची हृदयद्रावक तितकीच मनाला चटका लावणारी घटना शिवसेना आ.संजय गायकवाड यांना माहिती होताच त्यांनी, महिला बाल विकास अधिकारी सौ.राठोड व ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकार व कार्यकर्त्यांच्या साक्षीने आज 13 डिसेंबर रोजी मातोश्री कार्यालयात युवतीचे तिच्या प्रियकरा सोबत लग्न लावून समाजात एक चांगला संदेश दिला. 

       या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील उषा सुरेश शिंगणे या युवतीचे वडगाव येथे राहणारा मोल मजुरी करुन पोट भरणारा आत्याभाऊ विनोद छोटुराम पठ्ठे याच्या सोबत प्रेम संबध जुळले व या संबधातून त्यांना एक मुलगा देखील झाला. मात्र समाज काय म्हणल या भितीने सदर युवतीने ते अर्भक झुडपात टाकुन दिले होते. या दरम्यान त्या अर्भकाला कुत्र्यांनी चावा देखील घेतला. जखमी झालेल्या बाळाला बुलडाणा ग्रामीण पोलिस व महिला बाल कल्याण अधिकारी यांच्या पुढाकारातून जिल्हा सामान्य रुग्णालय व नंतर अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र बाळ लहान असल्याने पोलिस व न्यायालयाच्या आदेशाने त्या मातेचा शोध घेण्यास बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांना यश आले व बाळाला आईचे दुध मिळावे यासाठी रुग्णालयात मातेला ठेवण्यात आले. त्या ठिकाणी सदर युवती बाळासोबत राहिल्याने तिच्या वात्सल्याला पाझर फुटला व तिने बाळाचा सांभाळ आपणच करणार, अशी भुमिका घेतली. मात्र घरच्यांनी घरातुन काढुन दिल्याने सदर युवती बुलडाण्यात बाळाला घेवून भटकंती करु लागली. भिक मागुन मिळेल ते खावून आपला व आल्या बाळाचा संगोपन ती करत होती. अशातच बुलडाणा आ.संजय गायकवाड यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगुन महिलेची राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली. ग्रामीणचे ठाणेदार नवलकर व तीचा प्रियकर म्हणजे विनोद पठ्ठेला कार्यालयात बोलावून सैनिकी स्टाइलने समज दिली. ठाणेदार सारंग नवलकर व महिला बाल कल्याण अधिकाकरी सौ.राठोड यांच्या उपस्थितीत आज ‘मातोश्री’ या जनसंपर्क कार्यालयात दोघांचे लग्न लावून दिले व रोख रकमेची मदतही केली. या पवित्र कार्यात शर्मा यांनी मंगलाष्टके म्हटली. टाळ्यांच्या गजरात पवित्र कार्यपार पडले. आ. संजय गायकवाड यांच्या कार्याला उपस्थितांनी व सर्वांनी मानाचा सलाम ठोकला. यापुर्वी देखील दोन लग्न संजय गायकवाड यांनी लावून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.


 स्वराज"चे मातोश्रीवरच नामकरण


पिडीत युवतीला या संबंधा मधुन जन्मलेल्या बाळाचे नामकरण विधी या प्रसंगी संपन्न झाला. आ.संजय गायकवाड यांच्या वाणीतून त्या बाळाचे नाव ‘स्वराज’ असे ठेवण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी पाळणा म्हणून पेढे वाटुन ‘स्वराज’चे स्वागत केले. याप्रसंगी सर्व उपस्थित महिला व नागरीक, युवकांच्या डोळ्यातून पाणी आले व वातावरण भावूक झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.