शिंदेचे विमान उडवण्यास पायलटचा जळगांव विमानतळावर ऐनवेळी नकार
शिंदेचे विमान उडवण्यास पायलटचा जळगांव विमानतळावर ऐनवेळी नकार
लेवाजगत न्यूज जळगांव-"वैमानिकाने ऐनवेळी विमान उडवण्यास नकार दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विमानतळावरच तासभर ताटकळत बसण्याची वेळ आल्याची विचित्र घटना समोर आली आहे. पण या सकारात्मक गोष्ट म्हणजे शिंदे यांना झालेल्या या विलंबामुळे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका महिलेला वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली आहे."
"एकनाथ शिंदे शुक्रवारी संत मुक्ताई आषाढी वारी निमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दौऱ्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सायंकाळी 7 च्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी जळगाव विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. तेथून ते खासगी विमानाने रात्री 8 वा. मुंबईला पोहोचणार होते. पण जळगावमध्येच एका कार्यक्रमात त्यांना रात्रीचे 8 वाजले. त्यानंतर ते मुंबईला निघाले. पण ऐनवेळी पायलटने उड्डाण भरण्यास असमर्थता दर्शवली."
"यासंबंधीच्या माहितीनुसार, एटीसीची परवानगी नसल्यामुळे वैमानिकाने उड्डाण भरण्यास उपमुख्यमंत्र्यांना नकार दिला. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या वेळेनुसार रात्री 8 वा. इतर विमानांच्या उड्डाणांची वेळ होती. त्यामुळे मुंबईत दुसऱ्या विमानांच्या लँडिंगला परवानगी नव्हती. त्यामुळे पायलटने एटीसीच्या परवानगीशिवाय उड्डाण कसे करणार? असा प्रश्न केला. त्यामुळे काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळात एकनाथ शिंदे विमानतळावरच बसून होते."
"उपमुख्यमंत्र्यांना राज्याच्या राजधानीत पोहोचण्यास उशीर होत असल्याचे पाहून मंत्री गिरीश महाजन व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी वैमानिकाशी संपर्क साधला. त्यांनी वैमानिकाची अडचण समजून घेतली. त्यानंतर विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांचे एअर ट्रॅफिक कंट्रोलशीही बोलणे सुरू होते. या सर्व प्रक्रियेला पाऊण तास लोटला. अखेर विमानाच्या उड्डाणाला परवानगी मिळाली. त्यानंतर एकनाथ शिंदे जळगाव येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत