Header Ads

Header ADS

सोनम रघुवंशीचंं अपहरण? कुटुंबाने नेमकी काय भीती व्यक्त केली ?

 

Sonam-Raghuvanshi-kidnapping-what-fear-explained-by-the-family



सोनम रघुवंशीचंं अपहरण? कुटुंबाने नेमकी काय भीती व्यक्त केली ?

वृत्तसंस्था इंदूर- या ठिकाणी राहणारा राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे लग्नानंतर मधुचंद्रासाठी शिलाँगला गेले होते. २३ मे पासून राजा आणि सोनम यांचा संपर्क त्यांच्या कुटुंबाशी झाला नाही. त्यानंतर काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी शिलाँग गाठलं. पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या, व्यक्तिगत पातळीवर शोध सुरु केले. अखेर ११ दिवसांनी म्हणजेच २ जूनच्या दिवशी दुपारी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. हा मृतदेह साफ कुजला होता. त्या मृतदेहावरील हातावर असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली. राजा रघुवंशीची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान राजाची पत्नी सोनम ही अद्यापही बेपत्ताच आहे. आता सोनमचं अपहरण करण्यात आलं असावं असा संशय तिच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे.




सोनम रघुवंशीच्या भावाने काय म्हटलंय?

राजाचा मृतदेह २ जून रोजी खोल दरीत सापडला. मात्र सोनम अद्यापही बेपत्ता आहे. यानंतर सोनमच्या भावाने म्हटलं आहे की, सोनम रघुवंशीचं अपहरण करण्यात आलं असावं. बचाव पथकाने हर तऱ्हेने सोनमचा शोध घेतला आहे. मात्र ती सापडलेली नाही. माझी बहीण जिवंत असणार आणि तिचं अपहरण झालेलं असावं अशी भीती मलाच नाही आम्हाला सगळ्यांना वाटते आहे असं सोनमच्या भावाने म्हटलं आहे. या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जावी अशी मागणीही सोनमच्या भावाने त्याच्या कुटुंबातर्फे केली आहे. माझी बहीण २३ मे पासून बेपत्ता आहे आणि तिच्याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. सोनमची बॅग आणि तिचा फोनही सापडलेला नाही. आम्ही पोलिसांना ही विनंती करतो आहोत की त्यांनी त्यांच्या तपासाचा वेग वाढवावा आणि योग्य दिशेने तपास करुन सोनमला तरी जिवंत आमच्याकडे सोपवावं. तिचं अपहरण झालेलं असावं असं आम्हाला वाटतं आहे असं सोनमच्या भावाने माध्यमांना सांगितलं आहे.

सोनमचे वडील नेमकं काय म्हणाले?

“माझी मुलगी अद्यापही बेपत्ता आहे. मेघालयमधले पोलीस हे प्रकरण फारसं गांभीर्याने घेत नाहीयेत असं दिसतं आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच सोनम आणि राजाच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आहे. राजाचा मृतदेह मिळाला पण मला वाटतं आहे की सोनमचं अपहरण झालं असावं. तिला सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत. पोलिसांनी अजूनही नीट प्रयत्न केले तर ती जिवंत सापडण्याची शक्यता आहे.” असं सोनमचे वडील देवी सिंग यांनी म्हटलं आहे.

नेमकी ही घटना काय?

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशीचं लग्न सोनमशी झालं होतं. ११ मे रोजी हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम दोघंही मधुचंद्रासाठी रवाना झाले. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हे दोघंही सुरुवातीला बंगळुरुला गेले. त्यानंतर बंगळुरुमार्गे हे दोघंही गुवाहाटीला गेले. गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. २० ते २२ मे या कालावधीत राजा आणि सोनम दोघंही त्यांच्या कुटुंबांच्या संपर्कात होते. २३ मे रोजी आम्ही शिलाँगला जात आहोत तिथून फोन करतो असं या दोघांनीही कुटुंबाला सांगितलं होतं. मात्र शिलाँगला ते दोघंही गेल्यापासून त्यांचा संपर्क तुटला. या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे शिलाँग या ठिकाणी दाखवतं होतं. या दोघांनीही शिलाँगमध्ये फिरण्यासाठी भाडे तत्त्वावर फिरण्यासाठी मिळणारी अॅक्टिव्हा घेतली होती अशीही माहिती समोर आली. यानंतर या दोघांचाही शोध सुरु होता. पोलिसांना २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र त्याची पत्नी सोनम ही अद्यापही बेपत्ता आहे. तिच्याबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे तिचं अपहरण झालं असावं असा संशय तिच्या कुटुंबाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.