न्हावी येथे गणेश व दुर्गा भक्तांचे ग्रामपंचायतीवर कुलूपबंद आंदोलन – रस्त्यांच्या कामाबाबत संतप्त ग्रामस्थांचा प्रश्न
न्हावी येथे गणेश व दुर्गा भक्तांचे ग्रामपंचायतीवर कुलूपबंद आंदोलन – रस्त्यांच्या कामाबाबत संतप्त ग्रामस्थांचा प्रश्न
न्हावी ग्रामपंचायत समोर आज गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमून संतप्त आंदोलन करण्यात आले. गावातील रस्त्यांची दुरवस्था, वारंवार अर्ज करूनही काम न सुरू झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूपबंद केले.
दि. ४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीकडे अर्ज देण्यात आला होता तसेच २० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप काम सुरू न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
सरपंच व ग्रामसेवक यांनी "काम सुरू आहे" असे सांगितले, परंतु ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता काम बंद असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत यायला सांगितले, मात्र ते तयार नसल्याने ग्रामस्थांत अधिक रोष निर्माण झाला.
जुनी गुजरी परिसरात रस्ते उकरून ठेवले असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तरीही ग्रामपंचायत "काम सुरू आहे" असे सांगत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांचा स्पष्ट इशारा – “गावातील रस्त्यांची २ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
या आंदोलनाची सांगता “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत