“पक्ष बळकटीकरण हेच आमचं ध्येय” – उपमुख्यमंत्री अजित पवार
“पक्ष बळकटीकरण हेच आमचं ध्येय” – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – “पक्ष बळकटीकरण हेच आमचं प्रमुख ध्येय आहे. कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत प्रत्येकाने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सर्वेसर्वा मा. ना. अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेणे, संघटनेत रचनात्मक बदल घडविणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणे या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आगामी निवडणुकांसाठी उमेदवार निवड, प्रचार धोरण, बूथस्तरावरील संघटन आणि युवकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात आला.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पक्ष हे व्यक्तीपेक्षा मोठे आहे. आपले कार्य हे विकासाभिमुख आणि लोकसेवा केंद्रित असले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.”
बैठकीच्या शेवटी पुढील महिन्यात जिल्हानिहाय संघटन बैठकांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत