Contact Banner

सावदा येथे कॉपीमुक्त अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वी सभा संपन्न

savda-yethe-copymukt-abhiyanas-utsphurt-pratisad-shri-a-g-hy-school-ani-shri-na-go-patil-junior-college-sabha-sampann


सावदा येथे कॉपीमुक्त अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वी सभा संपन्न

सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे कॉपीमुक्त अभियान (गैरमार्गाशी लढा) या विषयावर आयोजित जनजागृती सभा अतिशय यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिक अभ्यासाची व नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समिती सभापती सचिन चुडामण बऱ्हाटे, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची उपस्थिती लाभली.

यावेळी शिक्षण समिती सदस्य सिमरन राजेश वानखेडे, नकुल नितीन बेंडाळे, फिरोज खान अब्दारखा, गणेश भागवत सोनवणे, प्रतिक्षा मनिष भंगाळे, विजया कुशल जावळे, सुनीता संजय तायडे, सलीम पिंजारी, सुभाष सुपडू तेली, संजय मधुकर तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक पी. जी. भालेराव यांनी केली. कॉपीमुक्त अभियानाचे महत्त्व स्पष्ट करताना संजय मोतीराम महाजन यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन केले.

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत व प्रवेशाची पावती (रिसीट) कशी तपासावी, याची माहिती अतुल सपकाळे यांनी दिली.

यावेळी सिमरन वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच कला, क्रीडा व इतर गुणांमधूनही यश मिळवता येते, असे प्रेरणादायी मत व्यक्त केले. प्रतिक्षा मनीष भंगाळे यांनी विद्यार्थ्यांनी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे, एकाग्रतेशिवाय यश मिळत नाही, असे सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसून कॉपी करून आयुष्यात पुढे जाता येत नाही, असे ठामपणे नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडील, शाळा, गाव व राष्ट्राचा अभिमान जपावा, कठोर परिश्रमानेच यश संपादन करावे, परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता वाममार्ग टाळावा, असा मोलाचा संदेश दिला.

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्व वक्त्यांचे विचार अतिशय एकाग्रतेने ऐकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक नंदू पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.