Contact Banner

खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रमी टप्पा; अंजाळेकर नेत्रालयाच्या अभियानाला अभूतपूर्व यश

khandesh-vidarbha-sambhajinagar-61229-cataract-surgeries-historic-milestone-godavari-foundation-jalgaon


खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रमी टप्पा; अंजाळेकर नेत्रालयाच्या अभियानाला अभूतपूर्व यश

जळगाव | लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत कार्यरत ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाने मोतीबिंदू निर्मूलन अभियानात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. सन २००८ ते २०२६ या कालावधीत खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगर विभागातील तब्बल ६१ हजार २२९ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना नवदृष्टी देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विविध मोफत तपासणी शिबिरांमधून गरजू रुग्णांची निवड करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या अभियानामुळे हजारो रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळाली असून त्यांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.






या यशामागे डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांचे मार्गदर्शन लाभले. मोतीबिंदू शिबिरांचे समन्वयक डॉ. नितू पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. अश्विनी काकडे तसेच सबा शेख, प्रतिक्षा सुटे, तृप्ती भोयरकर, स्वाती खरे, खुशी कांबळे आणि संजय महाजन यांच्या अथक परिश्रमामुळे हे अभियान यशस्वी झाले.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर आणि दिवंगत गोदावरी आजी यांच्या सेवाभाव, करुणा आणि समाजसेवेच्या प्रेरणेतून हे अभियान उभे राहिले आहे. कोणताही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असून भविष्यातही हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविले जाणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून शस्त्रक्रिया सुरू करून त्यानंतर डॉक्टरांचे पथक शिबिरस्थळी जाऊन दुपारपर्यंत रुग्णांची तपासणी करते. दुर्गम भागात जाऊन सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोतीबिंदू शस्त्रक्रियांची वर्षनिहाय आकडेवारीनुसार २००८ ते २०११ या कालावधीत ८,२१३, तर २०१२ ते २०२६ या कालावधीत ५३,०१६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून एकूण संख्या ६१,२२९ इतकी झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत दर्जेदार नेत्रोपचार पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे अभियान आज हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव्या प्रकाशाची पहाट घेऊन आले आहे.

मोतीबिंदू शिबिरांचे समन्वयक डॉ. नितू पाटील म्हणाले, "मनापासून निश्चय केला तर कोणतेही उद्दिष्ट साध्य होते. पहाटे पाच वाजल्यापासून शस्त्रक्रिया सुरू होतात. त्यानंतर आमचे डॉक्टर शिबिरस्थळी जाऊन दुपारपर्यंत तपासणी करतात. रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळाल्याचा आनंद हीच आमच्या सेवाकार्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे."


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.